नीरजा भानोत! तशी कुणालाही फारशी परिचित नसलेली ती इन मिन तेवीस वर्षे वयाची तरुणी. ‘हिंदुस्थान टाइम्स’चे तेव्हाचे मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार हरीश भानोत यांची ती कन्या, हीच काय ती तिची ओळख.
... पण सुंदर, सुडौल व नाजुक दिसणाऱ्या नीरजामधील रणरागिणींचे दर्शन साऱ्या जगाला झाले व एका रात्रीत नीरजा साहस व कर्तव्य तत्परतेची प्रतीक बनली. दुर्दैवाने हे कौतुक सुरू होण्यापूर्वीच नीरजा जगाचा निरोप घेऊन निघून गेली होती. हवाई अतिरेक्यांच्या गोळ्यांची शिकार बनली होती.
नीरजा पॅन-ॲम विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम करत होती. ५ सप्टेंबर १९८६ रोजी कराची विमानतळावर तिच्या विमानात अतिरेकी चढले. त्यांनी पायलटना कॉकपिटमधून बाहेर काढले. प्रवाशांपैकी जे अमेरिकन असतील, त्यांचे पासपोर्ट जमा करण्याची मागणी त्यांनी नीरजाकडे केली. तिने ठामपणे नकार दिला. ही हुज्जत तब्बल १५ तास चालली. अखेर अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट करून विमान उडवून देण्याची धमकी दिली.
नीरजाने मोठ्या शिताफीने विमानाचा दरवाजा उघडला व प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. खरे तर ती स्वत: आधीच उतरू शकली असती; पण नीरजाने आधी लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.
ती एका सात वर्षांच्या मुलाला बाहेर काढत असताना संतापलेल्या अतिरेक्यांनी तिच्यावर बेछूट गोळीबार केला. तिच्या शरीराची चाळण झाली; पण तिने मुलाला वाचवले व मगच ती कोसळली.
हा अमेरिकन मुलगा पुढे पायलट झाला. त्याने लिहिले : ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट नीरजाच्या बलिदानाचे आहे.’
भारत सरकारने मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करून नीरजाच्या सर्वोच्च त्यागाचा सन्मान केला. तिच्या साहसाला सलाम!
- भारतकुमार राऊत